जालना- खरंतर मराठवाड्याला आजही इतर विभाग तुच्छतेने पाहतात .दारिद्र्य, मागासलेपण, असा हा मराठवाडा आहे. असं त्यांचं मत आहे. परंतु हे खोटं ठरवणारे देखील याच मराठवाड्याच्या मातीत जन्माला आले. त्यांनी हाती घेतलेल्या कामाची दखल फक्त मराठवाडा महाराष्ट्रच नव्हे तर इतर देशांना देखील घ्यावी लागत आहे. असं हे भरीव काम केलं आहे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या मंगरूळ या गावच्या अशोक देशमाने या तरुणाने. शेतकरी कुटुंबात दारिद्र्याची भीषणता सांगताना देशमाने यांनी सांगितले की” स्वतःच्या आईने दुसऱ्यांनी दिलेले जुने ब्लाउज घालून दिवस काढले आहेत परंतु तिने एकच शिकवले, शरीर घाण झाले तरी हरकत नाही परंतु मन घाण होऊ नये आणि आज त्यामुळेच मी उभा आहे”. मंगरूळ या गावी झालेली शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्या आत्महत्येमुळे विस्कळीत झालेले कुटुंब आणि शिक्षणापासून वंचित राहिलेली त्यांची मुलं ही फरपटत पाहणं शक्य न झाल्यामुळे गडगंज पगाराची नोकरी सोडून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सहावी पासून पंधरावी पर्यंत शिक्षणाची मोफत सुविधा करून देणारे असे हे ध्येय वडे तरुण आहेत. लग्नापूर्वीच त्यांनी वीस मुलांचा सांभाळ सुरू केला अशा या रिकामटेकड्या माणसाला कोण मुलगी देणार? त्यामुळे मुलींच्या वडिलांनी देखील या उपवाराकडे पाठ फिरवली .परंतु नंतर एक मुलगी अशी भेटली की ती लग्न झाल्यानंतर थेट 100 लेकरांची आई झाली. कसा झाला अशोक देशमाने यांचा प्रवास? किती केल्या परदेश वाऱ्या आणि आज काय परिस्थिती आहे “स्नेहवनाची” या सर्व प्रवासाची , प्रेरणादायी, मंत्रमुग्ध करणारी ही मुलाखत घेतली आहे जालन्यातील निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. पद्माकर सबनीस आणि सौ. धनश्री सबनीस यांनी.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172