जालना- “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”. संतांनी दाखवलेला हा मार्ग जर पत्करला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील नाव्हा येथे असलेल्या सौ.संगीता अर्जुन घोडके. बाल वयातच विवाह झाल्यानंतर पुढे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं , परंतु मार्गदर्शक जर योग्य मिळाला आणि आपण त्याने दाखवलेल्या मार्गावर गेलो तर जीवनाची कशी “जीवनोन्नती “होते हेच या महिलेने दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “उमेद” हे महिलांसाठी एक अभियान चालवलं जातं. जिल्हा परिषद अंतर्गत उमेद नावाने हे स्वतंत्र अभियान चालवले जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील उद्योजकांना बळ देण्यासाठी हे अभियान काम करते. या अभियानासोबत 2015 मध्ये जोडल्या गेलेल्या सौ. संगीता घोडके यांनी 2021 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज दाल मिल, शेळीपालन, मत्स्य पालन, या व्यवसायांमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन त्या घेत आहेत. याची दखल घेत उमेद अभियानाच्या मार्फत एसबीआय फाउंडेशनने नुकत्याच घेतलेल्या “घे भरारी, मला पंख मिळाले” या कार्यक्रमांतर्गत सौ. संगीता घोडके यांना महाराष्ट्रातून दुसरा पुरस्कार मिळाला आहे. घरच्या बिकट परिस्थितीला न डगमगता या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश मिळवला आहे. सहा लाख रुपये रेशमी साडी , सोन्याचे झुमके आणि नथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.( सौ.संगीता अर्जुन घोडके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-9322019534)
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172